वृक्षरोपण व संवर्धन ही काळाची गरज -जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे
वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय

वृक्षरोपण व संवर्धन ही काळाची गरज
-जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंब
पंढरपूर दि.09:- वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय. पृथ्वीवरील मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज मोठी असल्याचे जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा व सत्र न्यायालय, पंढरपूर येथील आवारामध्ये जिल्हा न्यायाधीश श्री.लंबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तदर्थ जिल्हा न्यायाधीश बी. बी. तोष्णीवाल, अति.जिल्हा न्यायाधीश एन. के. मोरे, न्यायाधीश एम. आर. जाधव, न्यायाधीश एस. एच. इनामदार, न्यायाधीश. ए. ए. खंडाळे, न्यायाधीश ए. आर. यादव, न्यायाधीश टी. जी. बन्सोड, न्यायाधीश. एम. आर. कामत, न्यायाधीश श्रीमती आर. जी. कुंभार तसेच पंढरपूर अधिवक्ता संघाचे पदाधिकारी, विधीज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा न्यायाधीश श्री लंबे म्हणाले, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूते असून, त्यात ‘वायू’ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण, वायूविना मानवी जीवनाची कल्पना करणंच अशक्य आहे. शुद्ध हवा, अर्थातच प्राणवायू आपल्याला झाडांपासून मिळतो. ही झाडं पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीची संजीवनी आहे. वृक्षांमध्ये प्राणवायू पुरविण्याची तसेच वातावरणातील अशुद्ध व विषारी वायू शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे, वृक्ष हे जीवसृष्टीचे खऱ्या अर्थाने जीवनदाते असल्याने जुन्या वृक्षांची काळजी घेत, जास्तीत जास्त नवीन वृक्ष सातत्याने लावले पाहिजेत.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीच्या आवारामध्ये वड, पिंपळ, आवळा तसेच, जांभूळ असे विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.